धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्ग झाला सुरु
June 10, 2024
0
धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्ग सर्वांसाठी सुरू
मुंबईतील महत्त्वाकांक्षी अशा 'धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गा'वरील नरिमन पॉईंट ते हाजीआली पर्यंतचा बोगदा आज खुला करण्यात आला. यामुळे शहरातील वाहतूक अधिक वेगवान होणार असून ४०-४५ मिनिटांचे अंतर अवघ्या ८ ते १० मिनिटात पार करता येणे शक्य होणार आहे. सागरी किनारा मार्गाच्या नरिमन पॉईंट येथून वरळी पर्यंत जाण्याऱ्या मार्गाची पाहणी करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विंटेज गाडीतून प्रवास करत नरिमन पॉईंट ते हाजीआली पर्यंत तयार केलेल्या या बोगद्याची पाहणी केली. सध्या सव्वा सहा किलोमीटर लांबीचा हा बोगदा आजपासून सुरू करण्यात आला असून जुलै महिन्यापर्यंत नरिमन पॉईंट ते वरळी हा सागरी मार्गाचा दुसरा टप्पाही सुरू होईल.
हा बोगदा अत्यंत अद्ययावत पध्दतीने बांधण्यात आला आहे. अत्यावश्यक परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्यासाठी टेलिफोन देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. आज आम्ही स्वतः या फोनवरून फोन करत नियंत्रण कक्षातून आपत्कालीन परिस्थितीत कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो तेही जाणून घेतले.
यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.